दुर्घटनाग्रस्त चित्रपट आहेत तरी कुठे?

 लॅटिन अमेरिकेतील चिली देशात झालेल्या एका खाण दुर्घटनेवर आधारित चित्रपट करण्याची तयारी हॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माते माईक मेदावॉय करीत आहेत. ही दुर्घटना घडल्यानंतर त्यामध्ये अडकलेल्या ६९ खाण कर्मचार्‍यांची तब्बल ३३ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर सुटका करण्यात आली होती. निर्माते मेदावॉय हे त्यांच्या ‘ब्लॅक स्वॉन’ आणि ‘शटर आइलंड’ या दोन चित्रपटास मिळालेल्या यशामुळे चर्चेत आहेत. खाण दुर्घटनेवरील आधारित चित्रपटाची कथा लिहिण्याची जबाबदारी त्यांनी प्युटोरिकोचे पटकथाकार लेखक जॉन रिवेरो यांच्याकडे सोपविली आहे. जॉस रिवेरो यांना २००५ मध्ये  ‘मोटार सायकल डायरी’च्या पटकथेसाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला होता.
दुर्घटनेवर आधारित चित्रपटांची निर्मिती करण्याची प्रथा खरे तर अमेरिकेपासून सुरू झाली आहे. १९७४ मध्ये दोन नामवंत स्टुडिओंनी (ट्वेंटीथ सेंचुरी फॉक आणि वॉर्नर ब्रदर्स) एकत्र मिळून ‘टावरिंग इन्फर्नो’ची निर्मिती केली होती. या चित्रपटाचे कथानक थोडक्यात असे. जगातील सर्वात उंच इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार असते आणि निकृष्ट विद्युत उपकरणांमुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागते. १३८ मजली या इमारतीच्या ८० व्या मजल्यावर उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू असतो. मनुष्याचा लोभीपणा आणि गुणवत्तेचा अभाव हाच या चित्रपटात खलनायक होता.  उत्कृष्ट पद्धतीच्या सादरीकरणामुळे हा चित्रपट ‘मैलाचा दगड’ ठरला आहे. या चित्रपटाने बरेच पुरस्कार  मिळविले होते.
‘टावरिंग इन्फर्नो’च्या यशानंतर पाच वर्षांनी  म्हणजे १९७९ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते यश चोपडा यांनी ‘काला पत्थर’ या चित्रपटाची निर्मिती केली. यापूर्वीचे त्यांचे चित्रपट प्रेम कथानकावरच आधारित होते परंतु या चित्रपटाच्या कथानकाची त्यांनी निवड केल्यानंतर चित्रसृष्टीतील अनेक दिग्गजांना आश्‍चर्याचा धक्का बसला होता. या चित्रपटाच्या पटकथेची जबाबदारी सलीम-जावेद या जोडगोळीवर सोपविण्यात आली होती. या जोडीने १९७५ मध्ये घडलेल्या  ‘चसनाला खाण दुर्घटने’ला डोळ्यासमोर ठेवून पटकथेचे लिखाण केले. या दुर्घटनेत ३७२  खाण कामगारांना जलसमाधी मिळाली होती. यश चोपडांच्या ‘काला पत्थर’ या चित्रपटात गाणी आणि संगीतावर विशेष लक्ष देण्यात आले होते. त्यामुळेच आज तीन दशकानंतरही या चित्रपटातील गाणी रसिकांच्या  स्मरणात आहेत. चांगले स्टार कास्ट, प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे कथानक आणि सुरेल संगीत या सर्वांचा उत्कृष्ट मिलाप झाल्याने अपेक्षेपेक्षा जास्त यश या चित्रपटाला मिळाले होते.
त्यानंतर एका वर्षाने बी. आर. चोपडा यांचा मुलगा  रवि चोपडाच्या दिग्दर्शनाखाली ‘द बर्निंग ट्रेन’ या चित्रपटाची निर्मिती केली गेली. हा चित्रपट हॉलीवूडमधील ‘बर्निंग ट्रेन’वर आधारित होता. या चित्रपटातील जवळपास बर्‍याच दृश्यामध्ये ‘टावरिंग इफर्नो’ छाप दिसत होती. दिल्लीहून मुंबईपर्यत धावणार्‍या या रेल्वेगाडीला खलनायकाच्या इर्षेचे शिकार व्हावे लागते. या चित्रपटात त्यावेळच्या  आघाडीच्या सर्व नायक व नायिकांचा समावेश होता. या चित्रपटातील सुमधुर गाणी आजही कानी पडतात. या दोन दुर्घटनाग्रस्त चित्रपटांच्या बाबत एक वास्तव जोडले गेले आहे. याच वेळी भारतात टेलिव्हिजनचा विस्तार सुरू होता. त्यामुळे टीव्ही चॅनलवाल्यांनी चित्रपटांचे हक्क मोठ्या किमतीने  खरेदी करण्यास सुरुवात केली होती. या दोन चित्रपटांवर करण्यात आलेल्या खर्चापेक्षा अधिक रक्कम टीव्हीवाल्यांकडून मिळाली. त्यामुळे पंधरा वर्षानंतर या दोन चित्रपटांची वर्णी यशस्वी चित्रपटांत केली गेली.
नेहमी यशस्वी फॉर्म्युल्याच्या शोधात राहणार्‍या बॉलीवूडने यानंतर मात्र एकाही दुर्घटनाग्रस्त चित्रपटाची निर्मिती करण्याचे धाडस दाखविले नाही. आज शंभर ते दीडशे कोटी रुपयांचे बजेट असलेल्या चित्रपटांची निर्मिती केली जात आहे परंतु त्यातील एकाही चित्रपटाचे कथानक दुर्घटनेवर आधारित नसते. वैयक्तिक नाते, नाजूक संबंध, प्रेमकथानक यांच्या भोवतीच फिरणार्‍या कथानकांच्या भोवताली आज बॉलीवूडमध्ये चित्रपटांची निर्मिती होत आहे. यशाचा शॉर्टकट म्हणून या चित्रपटांना मिळत असलेला प्रतिसाद हाही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरत आहे. बॉलीवूडची निर्मिती होऊन ७०-८० दशक उलटल्यानंतरही निसर्गाने घडविलेला प्रकोप, सुनामी किंवा मनुष्यनिर्मित दुर्घटना पडद्यावर चित्रित करण्याचे धाडस आजही बॉलीवूडमध्ये होताना दिसत नाही.
तरुण भारत, सदाफुली. ७ मार्च २०१२ 
✎ Edit Edit

Posted by - Admin,
on - Tuesday, March 13, 2012,
Filed under -
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
Loading navigation...

No comments:

Post a Comment

The Web Only VRITTABHARATI

हवामान

Subscribe Us

Subscribe Us for Latest Updates
Enter your email address:
ई-मेल करा व "वृत्ताभारती"चे सभासद व्हा.

FEATURED VIDEOS