मुंबईत रिक्षा चालकांचे आज आंदोलन
मुंबई -
मीटरमध्ये फेरफार करून प्रवाशांना लुटणाऱ्या रिक्षा चालकांविरुद्ध प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) केलेल्या कारवाईविरोधात काही दिवसांपूर्वी अघोषित बंद पुकारून प्रवाशांना वेठीस धरणारे रिक्षा चालक उद्या सोमवारी कामगार नेते शरद राव यांच्या ‘मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियन’च्या झेंडय़ाखाली पुन्हा रस्त्यांवर उतरून आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात ९० हजारपैकी सुमारे दहा हजार रिक्षा चालक सहभागी होण्याची शक्यता आहे. मीटर रिक्षा सेवा बंद करून शहरात सर्वत्र शेअर रिक्षा सुरू करावी आणि चालकांना महिन्याला किमान २५ हजार रुपये उत्पन्न मिळेल इतकी रिक्षा भाडेवाढ द्यावी, अशी मागणी आता करण्यात आली आहे. वांद्रे येथील परिवहन आयुक्त कार्यालयाबाहेर सकाळी ११ ते संध्याकाळी पाच या वेळेत धरणे देऊन रिक्षा चालक हे आंदोलन करणार आहे. या आंदोलनात १० हजार रिक्षा चालक सहभागी होणार असल्याचा दावा राव यांनी केला असून काही चालक आपल्या रिक्षासुद्धा घेऊन येण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे. इतक्या मोठय़ा संख्येने रिक्षा रस्त्यांवर न आल्यास उपनगरवासीयांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. बेस्ट आणि पालिका संपाचा अनुभव लक्षात घेता रिक्षांचा अघोषित बंद पुकारून प्रवाशांना वेठीस धरण्याची खेळी राव यांच्याकडून खेळली जाण्याची भीती व्यक्त होत आहे.गेल्या महिन्यात अंधेरी आरटीओने पश्चिम उपनगरांत मीटर जलद करून प्रवाशांना लुटणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात एका रात्रीची धडक मोहीम राबविली होती. काही तासांत १५० रिक्षांची तपासणी करून त्यापैकी ९७ रिक्षांच्या मीटरमध्ये फेरफार केला असल्याचे तर १८ रिक्षांची कागदपत्रे बोगस असल्याचे आढळून आले आहे. या शिवाय १७ रिक्षा चालकांवर भाडे नाकारल्याबद्दल कारवाई करण्यात आली होती. या कारवाईमुळे धास्तावलेल्या रिक्षा चालकांनी अघोषित बंद पुकारून तात्काळ आपले मीटर दुरूस्त करून घेतले. त्यावेळी जनप्रक्षोभ लक्षात घेऊन आरटीओच्या कारवाईचे समर्थन करणाऱ्या रिक्षा संघटना आरटीओवर दबाब टाकण्यासाठी ही नवी खेळी करीत आहे, असेही वाहतूक क्षेत्रात बोलले जात आहे.
on - Monday, October 3, 2011,
Filed under - मुंबई-कोकण , राज्य
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
No comments:
Post a Comment