व्याजदराच्या चिंतेने बाजार पुन्हा धास्तावला
स्रोत: तरुण भारत
मुंबई, ३० सप्टेंबर - देशात खाद्यान्न महागाईचा दर वाढल्याने रिझर्व्ह बँक पुन्हा व्याजदरात वाढ तर करणार नाही ना, या चिंतेने आज मुंबई शेअर बाजारातील निर्देशांक तब्बल २४४ अंकांनी खाली आला. जागतिक बाजारातील मंदीचाही हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. कालच्या सत्रात निर्देशांकाने २५२ अंकांची कमाई केली होती. आज तो २४४.३१ अंकांनी खाली आला आणि १६,४५३.७६ वर स्थिरावला. या घसरणीमुळे निर्देशांकाची जुलै ते सप्टेंबर या तिमाहीतील घसरण ९.६ टक्क्यांवर पोहोचली आहे. गेल्या तीन वर्षातील ही विक्रमी घसरण मानली जात आहे. १७ सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात खाद्यान्न महागाईचा दर वाढल्याने बाजाराला पुन्हा व्याजदरवाढीची चिंता सतावू लागली आहे. खुद्द अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनीही चिंता व्यक्त केल्याने गुंतवणूकदारांनी आपला हात आखडता घेतला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीतही आज ७२.२० अंकांची घसरण झाली. तो ४९४३.२५ वर बंद झाला. धातू, रिऍलिटी, बँक या क्षेत्रातील शेअर्स आज सर्वाधिक तोट्यात होते. बाजारातील दुसर्या क्रमांकाची मोठी कंपनी इन्फोसिसचे शेअर्स आज ०.६४ टक्क्याने खाली आले. टाटा कन्सल्टन्सी, विप्रो या सॉफ्टवेअर निर्यात क्षेत्रातील शेअर्सही आज घसरले होते. जागतिक बाजारातील मंदीमुळे या कंपन्यांना फटका बसला. टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यात अनिल अंबानी यांचे नाव संशयितांमध्ये आल्याने त्यांच्या समूहातील कंपन्यांनाही बरेच नुकसान सहन करावे लागले. आज धातू क्षेत्रातील शेअर्स सर्वाधिक तोट्यात राहिले. त्यापाठोपाठ रिऍलिटी, बँक आणि ऑटो क्षेत्राचा क्रमांक लागतो.
No comments:
Post a Comment